मुंबई | पंतप्रधान सहाय्यता निधीतून औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास (घाटी) देण्यात आलेले व्हेंटिलेटर निकृष्ट असून ICU कक्षात लावण्याचा दर्जा नसल्याचे घाटीतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या निदर्शनास आले असून तसा अहवाल देखील यासंदर्भात नियुक्त केलेल्या घाटीतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने दिला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी दिली आहे.आमदार सतीश चव्हाण यांनी आज (१४ मे) पाहणी केली आहे.
PM Cares फंडातून घाटी रूग्णालयाला १५० व्हेंटिलेटर देण्यात आले. मात्र हे व्हेंटिलेटर निकृष्ट असून ICU कक्षात लावण्याच्या दर्जाचे नसल्याचे घाटीतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या निदर्शनास आले आहे. तसा अहवाल देखील यासंदर्भात नियुक्त केलेल्या घाटीतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने दिला आहे.

“खरंतर ज्यावेळी घाटीला १५० व्हेंटिलेटर देण्यात आले तेव्हा स्थानिक भाजप नेत्यांनी केंद्राने औरंगाबाद जिल्ह्याला कशी मदत केली याचा धिंडोरा पिटवला होता. मात्र हे व्हेंटिलेटर आता बिनकामाचे निघाल्यावर हे नेते तोंडघशी पडले आहेत. व्हेंटिलेटर कसे चांगले आहे हे सांगण्याचा भाजप नेते आता केविलवाणा प्रयत्न करू लागले आहेत. १५० व्हेंटिलेटर देण्याऐवजी पंधराच व्हेंटिलेटर चांगल्या दर्जाचे दिले असते तर अनेक गंभीर असलेल्या रूग्णांसाठी उपयोगात आणता आले असते”, असेही आमदार सतीश चव्हाण म्हणाले आहेत.
उच्चस्तरीय चौकशी करुन निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर पुरवणार्या कंपनीवर कारवाई करा !
मदत करता येत नसेल तर करू नका. मात्र असे निकृष्ट दर्जाचे वैद्यकीय उपकरणे देऊन कृपया रूग्णांच्या जीवाशी खेळू नका असे सुनावतानाच याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर पुरवणार्या कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी राज्य सरकारकडे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा