पाचोरा शहरात विजेचा लपंडाव ; नागरिक उकाड्याने हैराण..
झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया
दिलीप जय परदेशी
पाचोरा (झूम मराठी) उन्हाळा सुरू झाला असून उन्हाचा पारा वाढताच आहे. त्यामुळे सावलीसह गारव्याची नितांत आवश्यकता आहे. अशातच सकाळ, दुपार असो अथवा रात्र, वीज गेली तर अंगाची लाहीलाही होत आहे. अशी परिस्थिती असताना पाचोरा शहरात ठीक ठिकाणी (Mahavitran) महावितरणतर्फे होणारा वीजपुरवठा मात्र दिवसातून तीन ते चार वेळा आर्धा तास ते दोन तास वीज खंडित होत आहे. नेमका हा वीज पुरवठा खंडित का होत असेल, ही वीज लपंडाव का खेळत असेल, अशा अनेक प्रश्नांंचे जनसामान्यांच्या मनात काहूर माजलेले आहे.
पाचोरा शहरात महावितरण वीज बिल वसुलीसाठी (Mahavitran) महावितरण मात्र सक्ती करताना दिसते. मग वीजपुरवठा सुरळीत का देऊ शकत नाही, आधी वीज सुरळीत द्या, नंतरच वीजबिलाची सक्ती करा असे अनेक मुद्दे नागरिक उपस्थित करताना दिसत आहेत.
उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने पंखे, कूलर व एसी यांचा वापर वाढला आहे. अशा स्थितीत दिवसभर वीजपुरवठा बंद पडण्याचे प्रकार झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. ‘महावितरण’कडून दुरुस्ती कामासाठी वीजपुरवठा बंद राहणार असेल तर तसे ग्राहकांना आधी एक-दोन दिवस मोबाइलवर ‘एसएमएस’द्वारे कळवले जाते. परंतु, वीजपुरवठा बंद राहणार असल्याबाबतचा कोणताही संदेश नसताना अचानक वीजपुरवठा बंद होत असल्याने नागरिक वैतागले आहेत.
वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे.यात मुख्यत्वेकरून सकाळी व दुपारी वीज खंडीत होण्याचे प्रमाण वाढले असुन महीलांना सकाळी सकाळी वीज खंडीत होत असल्याने पिण्याचे पाणी, घरातील वीजेवर अवलंबून असणार्या कामांचा खेळखंडोबा होत आहे.
यादृष्टीने महावितरण कंपनीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी भावनाही नागरिकांमधून व्यक्त होत आहे.




