Jalgoan | जिल्ह्यातील १८ कृषी केंद्रांचे परवाने रद्द..!
जळगाव जिल्ह्यातील १८ कृषी केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना खत व बियाण्यांचा पुरवठा नियमित करण्यात येत असले तरी, काही ठिकाणी खत अनुपलब्धतेबाबत शेतकऱ्यांकडून तक्रारी येत होत्या. या समस्येचा समाधान करण्यासाठी जिल्ह्यात गुण नियंत्रण निरीक्षकांनी व्यापक तपासणी मोहीम राबवली. या तपासणीतून अनेक खत विक्रेत्यांच्या चुकीच्या प्रक्रियांचा पर्दाफाश झाला, ज्यामुळे जिल्ह्यातील एकूण १८ कृषी केंद्र चालकांचे परवाने तात्पुरत्या स्वरूपात निलंबित करण्यात आले आहेत.
जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तालुकास्तरावर गुण नियंत्रण निरीक्षक आणि भरारी पथकामार्फत तपासणी मोहीम हाती घेतली. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात २० युरिया खरेदीदारांच्या तपासणीत खत साठवणूक व विक्रीमध्ये अनियमितता आढळली. या अनुषंगाने १३ खत विक्रेत्यांचा परवाना डिसेंबरमध्ये आणि ८ खत विक्रेत्यांचा परवाना जानेवारीमध्ये ठरावीक कालावधीसाठी निलंबित करण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या सुनावणीनंतर दोन महिन्यांत आढळलेल्या २१ पैकी १८ कृषी केंद्र चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, खत निविष्ठा विक्री केंद्रात त्रुटीसह नियमबाह्य गोष्टी आढळल्यास कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. कृषी निविष्ठा कायदा, अत्यावश्यक अधिनियम, परवाने अटी व नियमानुसार त्रुटी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्वक कृषी निविष्ठांचा योग्य दरात पुरवठा होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील कृषी विभागाने सक्रिय भूमिका घेतली आहे.



