हा तर लोकांचा आणि लोकशाहीचा अपमान’ – नरेंद्र मोदी
नवी दिल्ली(वृत्त संस्था) विरोधक संसदेचं कामकाज चालू देत नसल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा संताप व्यक्त करत निशाणा साधला आहे. मंगळवारी सकाळी झालेल्या भाजपा खासदारांच्या बैठकीत विरोधकांकडून वारंवार संसेदचं कामकाज बंद पाडणं हा संसदेचा, घटनेचा, लोकशाहाची आणि लोकांचा अपमान आहे असं म्हटलं आहे. पेगॅसस, कोरोना स्थिती, शेतकरी आंदोलन तसंच अन्य मुद्द्यांवरुन विरोधकांकडून लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ घातला जात असून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. नरेंद्र मोदींनी संसदेच्या कामकाजावरुन विरोधकांवर टीका करण्याची ही एका आठवड्यातील दुसरी वेळ आहे.
मीडियासमोर त्यांना उघडं पाडत सत्य मांडण्यास सांगितलं
गेल्या आठवड्यात नरेंद्र मोदींना काँग्रेसवर निशाणा साधत खासदारांना लोकं आणि मीडियासमोर त्यांना उघडं पाडत सत्य मांडण्यास सांगितलं होतं. एकीकडे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी विरोधकांना एकत्र आणत ब्रेकफास्ट बैठक घेतली असतानाच मोदींनी ही टीका केली आहे. यानंतर काँग्रेसकडून इतर पक्षांसोबत संसदेपर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी वाढत्या इंधनदराविरोधात निषेध करण्यात आला.
मोदींनी आपल्या फोनमध्ये शस्राची घुसखोरी केली
राहुल गांधी यांनीदेखील गेल्या आठवड्यात बैठक घेतली होती. यावेळी विरोधकांनी पत्रकार परिषद घेत पेगॅसस प्रकरणावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या फोनमध्ये शस्राची घुसखोरी केली असून भारताच्या लोकशाहीवर हल्ला केला आहे असा आरोप यावेळी त्यांनी केला होता.
संसदेत गोंधळाची स्थिती
मागील दोन आठवड्यांत लोकसभेला दिलेल्या ५४ तासांपैकी लोकसभेत केवळ ७ तास कामकाज झाले. तर राज्यसभेत ५३ तासांपैकी केवळ ११ तास कामकाज झाले. या संपुर्ण अधिवेशनाच्या कालावधीत १०७ तासांपैकी फक्त १८ तास कामकाज चालले. त्यामुळे किमान ८९ तास संसदेत गोंधळाची स्थिती होती
सलग नवव्या दिवशीही गोंधळ
पेगॅसस आणि इतर मुद्यांवरून गदारोळ केल्यानं, दोन्ही सभागृहांचं आजचं कामकाज तहकूब करावं लागलं. लोकसभेत आजचं कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप केला. या अधिवेशनाला सुरुवात झाल्यापासूनच विरोधक पेगॅसस हेरगिरी, कृषी कायदे आणि कोविड१९ या विषयांवर चर्चा घेण्याची मागणी करत आहेत. मात्र सरकारनं आडमुठेपणाचं धोरण अवलंबत चर्चेपासून पळ काढायचं धोरण अवलंबलं असल्याचा आरोप त्यांनी केला.
सरकारनं आपली भूमिका बदलून विरोधकांनी मागणी केलेल्या मुद्यांवर सभागृहात चर्चा घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी काँग्रेस, तृणमुल काँग्रेस, डीएमकेसह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी हौदात उतरून चर्चेची मागणी करत गदारोळ सुरु केला. त्यानंतर सभापती ओम बिरला यांनी आधी दुपारी १२ वाजेपर्यंत, तर नंतर पीठासीन अधिकाऱ्यांनी दिवसभरासाठी कामकाज तहकुब केलं.


