जमेल तेच वचन द्यायचे, हीच शिवसेनेची परंपरा, अन्यथा लोक तारे दाखवतात; मुख्यमंत्र्यांचा टोला
मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मणक्याच्या शस्त्रक्रियेमुळे बऱ्याच दिवसांपासून माध्यमांसमोर किंवा जनतेसमोर आले नव्हते. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनातही गैरहजर होते. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीकाही केली. आता मोठ्या कालावधीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समोर आले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.
राजकारण म्हटल्यावर आपण काही केले तर भ्रष्टाचार केला, नाही केले तर यांनी काहीच केले नाही. मग शेवटी आपली टिमकी आपल्यालाच वाजवावी लागते की आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. आम्ही हे करू, आम्ही ते करू आणि यालाच तर राजकारण म्हणतात. अनेक जण असे आहेत की वाटेल ते सांगतात. आम्ही तुमच्यासाठी तारे तोडून आणू, आम्ही तुमच्यासाठी चंद्रावर उड्डाणपूल बांधून देऊ. या काही गोष्टी होण्यातल्या नसतात त्या सांगतात आणि लोक फसतात आणि मतं देऊन मोकळी होतात. मग पाच वर्षे काही बोलायचं नाही. ‘अहो, तुम्ही बोलला होतात की, तुमच्यासाठी तारे तोडून आणू, मग लोक बऱ्याचदा त्यांनाच तारे दाखवतात. तर अशा गोष्टी आपण कधी केल्या नाहीत आणि करणारही नाहीत.’ जे जमेल तेच वचन द्यायचे हीच शिवसेनेची परंपरा आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाजपला चिमटा काढला.
शिवसेना आणि आता तर सोबत नवीन मित्र आलेले आहेत. काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे. आता आम्ही तिघे मिळून पुढची वाटचाल करत आहोत. आता आपण तिघे एकत्र आल्यानंतर इतर पक्ष कोण राहिले असेल ते तुम्हाला कळलं असेल. असेच चालले आहे. आम्ही या गोष्टी करू, आम्ही त्या गोष्टी करू… नंतर कालांतराने ते विसरतात आणि लोकही विसरतात. पण शिवसेनेची जी परंपरा शिवसेनाप्रमुखांनी आखून दिली आहे, एक म्हणजे खोटं बोलायचं नाही. जे जमणार असेल तेच वचन द्यायचं. जे जमणार नसेल निवडणूक जिंकण्यासाठीसुद्धा उपयोगी पडणारे असले तरीही खोटे वचन द्यायचे नाही. ही शिवसेनेची परंपरा आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.



