दादर ते नंदुरबार एक्सप्रेस आता भुसावळपर्यंत धावणार; खासदार स्मिता वाघ यांचा पाठपुरावा..
पश्चिम रेल्वेतर्फे नुकतीच सुरू करण्यात आलेली दादर-नंदुरबार एक्सप्रेस गाडी आता थेट भुसावळपर्यंत धावणार आहे. १९ जुलै ते २७ सप्टेंबरपर्यंतच्या कालाधीत ही गाडी सुरू राहणार असून, त्यासाठी जळगावच्या खासदार श्रीमती स्मिता वाघ यांनी पाठपुरावा केला होता. सदरच्या गाडीमुळे भुसावळ-जळगाव तसेच अमळनेरहून मुंबईकडे जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होऊ शकणार आहे. मात्र, आठवड्यातून फक्त एकच दिवस शुक्रवारी ही गाडी धावणार आहे.
दादर-नंदुरबार ही गाडी फक्त नंदुरबारपर्यंत धावणार असल्यामुळे विशेषतः जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय होणार होती. त्यामुळे दादर ते नंदुरबार धावणारी गाडी भुसावळपर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणी जळगावसह धरणगाव,अमळनेर येथील रेल्वे प्रवासी संघटना तसेच स्थानक सल्लागार समिती यांनी खासदार स्मिता वाघ यांच्याकडे केली होती. त्यांच्या त्या मागणीच्या अनुषंगाने खासदार श्रीमती वाघ यांनी पश्चिम रेल्वेच्या प्रशासनाकडे पाठपुरावा केला.
दरम्यान खान्देशला मुंबईशी जोडणाऱ्या दोन रेल्वे गाड्या यापूर्वीच सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु शुक्रवारी कोणतीही गाडी नसल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले होते. ही रेल्वे भुसावळपर्यंत वाढविण्यात आल्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे



