पाचोऱ्यात परदेशी राजपूत समाजाचा वधू-वर मेळावा उत्साहात..
पाचोरा (झूम मराठी वृत्त) वधू वा वर संशोधन करणे हे मोठे कठीण काम असल्याने परिचय मेळाव्यातून समाजबांधवांना सुविधा उपलब्ध होते. यामुळे याचे आयोजन हे अतिशय कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी केले. त्या परदेशी राजपूत समाज मंडळातर्फे आयोजीत वधू-वर परिचय मेळाव्यात बोलत होत्या.

पाचोरा येथे आज परदेशी राजपूत समाज मंडळाच्या वतीने भव्य वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यात जळगाव जिल्ह्याच नव्हे तर देशभरातून समाजबांधव आणि विवाहेच्छुक तरूण-तरूणी सहभागी झाले. प्रारंभी वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी, दीपक राजपूत जिल्हा प्रमुख आणि गणेशदादा परदेशी सह मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर आयोजकांच्या वतीने उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी बोलतांना शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी म्हणाल्या की, वधू-वर परिचय मेळावे हे काळाची गरज आहे. याच्या माध्यमातून वेळ आणि पैशाची बचत होऊन विवाह निश्चीतीचे काम होते. याचे आयोजन करणे सोपे काम नव्हे. तथापि, परदेशी राजपूत समाज मंडळ सातत्याने याचे आयोजन करत असल्याची बाब अतिशय कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
दरम्यान, वैशालीताई पुढे म्हणाल्या की, आज या वधू-वर परिच मेळाव्याच्या प्रसंगी मला माझ्या वडिलांची प्रकर्षाने आठवण येत आहे. सर्व समाज मंडळांच्या विविध कार्यक्रमांमध्ये त्यांचा हिरीरीने सहभाग असे. ते जर आज असते तर आजही त्यांनी मोठ्या उत्साहाने कार्यक्रमात भाग घेतला असता. या प्रकारच्या आयोजनांसाठी आपण सातत्याने मदत करू अशी ग्वाही देखील वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी याप्रसंगी दिली.




