आपल खान्देश
दोन भावांवर म्हसावद येथे वीज कोसळली!!
जळगाव : शेतात कापसाची पेरणी करताना पाऊस आल्याने रेखाबाईंच्या दोघा मुलांनी लिंबाच्या झाडाखाली आसरा घेतला अन् त्याच झाडावर वीज कोसळली. डोळ्यादेखत मुलांवर वीज कोसळल्याने आक्रोश करतच आई धावत सुटली… वीज पडल्यावर कोणी वाचणे शक्य नसताना दोघे जखमी भाऊ सुखरूप असून, विधवा आईच्या आक्रोशाला पाहून जणू यमराजही पळून गेला असावा, या चर्चेने जोर धरला.
म्हसावद येथील रेखाबाई माधव पाटील या कुणाल (वय २९) व चेतन (२७) अशा दोन्ही मुलांसह कापूस पेरणी करत होत्या. अचानक विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाल्याने पेरणी थांबवून दोन्ही मुले धावत कडुलिंबाच्या झाडाखाली थांबली. थोड्याच वेळात त्याच झाडावर वीज कोसळली. हे चित्र रेखाबाईंनी पाहिले. आईदेखत दोन्ही तरुण मुले परस्परविरुद्ध दिशेला फेकले गेल्याने हंबरडा फोडतच त्या धावत सुटल्या…शेजारील शेतात काम करणाऱ्या मजुरांसह शेतकरी, ग्रामस्थ मदतीला धावून आले. बेशुद्ध मुलांना जळगावी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचारादरम्यान दोघांचे जीव वाचविण्यात यश आले आहे. औद्योगिक वसाहत पोलिसांनी पंचनामा केला असून, जखमी कुणाल व चेतन यांची प्रकृती स्थिर आहे.



