राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित येत सत्ता स्थापन केली. या पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारमधील सहकारी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मुंबई महानगरपालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
माझे महापालिकेतील आणि सरकारमधील सहकारी भक्कमपणे काम करत असल्याने मी लोकप्रिय मुख्यमंत्री झालो. ते खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे असल्याने जागतिक स्तरावर मुंबईचे कौतुक होत आहे. पुढच्या कोणत्याही कामासाठी जिथे सरकारच्या सहकार्याची अपेक्षा आहे ते देण्याचे मी वचन देतो, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच यावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. निवडणुका तोंडावर आल्यावर मत मागताना वाकणारी, झुकलेली माणसं मत मिळाल्यानंतर ताठ होतात. मात्र ज्या लोकांना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवायचे असतात ते नेहमीच विनम्र असतात. तसेच स्वत: काही करायचे नाही पण महापालिका काय करते हा प्रश्न काही जण नेहमी उपस्थित करतात, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला.
तसेच नवीन वर्षाच्या सुरुवातीला चांगली कामे झाल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. ५०० चौ. फुटाच्या घरांवरील घरपट्टी माफ, मग कोस्टल रोडच्या मावळ्याने पूर्ण केलेला बोगदा आणि आज मुंबईकरांना ८० सुविधा बोटाच्या टिपेवर मिळणे, ही सगळी चांगली कामे वर्षाच्या सुरुवातीलाच झाली. याचा सर्वसामान्य जनतेला मोठा फायदा मिळणार आहे.
शासकीय, प्रशासकीय कारभाराबद्दल बोलताना तिळगूळ दिल्याशिवाय काम होत नाही असा गैरसमज आहे. याच गोष्टीला आजच्या कार्यक्रमामुळे आळा बसल्याचे ठाकरे म्हणाले. दरम्यान या कार्यक्रमावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, डॉ. इक्बालसिंह चहल यांनीदेखील मनोगत व्यक्त केले आहे
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा