आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
ठाकरे सरकारचा निर्णय : सोमवारपासून प्री-प्रायमरी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होणार
मुंबई :- राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या २० दिवसांपासून बंद असलेल्या शाळा सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. स्थानिक परिस्थितीनुसार सोमवारपासून शाळा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
शाळा सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने काल मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. जिथे कोरोना रुग्ण कमी आहेत, अशा ठिकाणीच कोरोना नियमांचे पालन करून शाळा सुरू केल्या जातील, असे वर्षा गायकवाड म्हणाले आहेत. २४ तारखेपासून पहिली ते बारावीचे सर्व वर्ग सुरू होणार आहेत. शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, अशी आमची भूमिका आहे.
त्यामुळे स्थानिक प्रशासनाशी एकरूप राहून परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानुसार भविष्यातील निर्णय घेण्यात यावेत, अशा सूचनाही गायकवाड यांनी दिल्या. त्याचबरोबर, पालकांची संमती आवश्यक असून त्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. यावेळी पहिल्यांदाच प्री-प्रायमरी शाळाही उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे पहिलीच्या विद्यार्थ्यांचीही आता शाळेची घंटा वाजणार आहे. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा सर्व नियम पाळून उघडण्यासाठी परवानगी दिली असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.



