राज्यस्तरीय काव्य संमेलनात श्रीरंग विद्यालयाचे सुनील म्हसकर सर ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी
Published by Yogesgeh Pardeshi
शहापूर : डी. वाय. फाउंडेशन, ठाणे जिल्हा ग्रामीण पत्रकार संघ, लोक हिंद वृत्तवाहिनी आणि साप्ताहिक शिवमार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ साहित्यिक व आधुनिक ओवीकार दिवंगत डॉ. दिलीप धानके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रविवारी किल्ले माहुलीच्या कुशीत माजी सभापती गजानन गोरे यांच्या फार्म हाऊसवर “प्रिय भावास” या विषयावर राज्यस्तरीय कविसंमेलन संपन्न झाले! ग्लोबल टीचर अवॉर्डने सन्मानित ठाणे येथील श्रीरंग विद्यालयाचे सहशिक्षक आणि “शारदासुत” या टोपणनावाने काव्यलेखन करणारे सुप्रसिद्ध कवी श्री.सुनील म्हसकर सर यांनी सादर केलेल्या “असा माझा भाऊराया हृदयी तो वसू दे” या काव्यरचनेने राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला!
सदर काव्यरचनेने रसिकांच्याही अश्रूंचा बांध फोडला. सुनील म्हसकर यांच्या ताल-सूर-लयबद्ध आणि त्यांच्या सुरेल आवाजात अनोख्या ढंगात सादर केलेल्या काव्याने सर्वांना अश्रू अनावर झाले. डॉ. दिलीप धानके यांच्याबद्दल कविता व प्रास्तविक सादर करताना लोकहिंद वृत्तवाहिनीचे संपादक महेश धानके* यांची भावाप्रति श्रद्धा पाहून तर सारेच संमेलन भावव्याकुळ झाले. सदर कविसंमेलनात ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, मुबंई अशा अनेक जिल्ह्यांतील विविध नामवंत व प्रतिभावंत कवींनी आपल्या दर्जेदार अशा उत्तम काव्यरचना सादर करून उपस्थितांची मने जिंकून घेतली!
काव्यसंमेलनप्रसंगी प्रमुख अतिथी डी.वाय.फाउंडेशनचे अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या शुभ हस्ते प्रथम, व्दितीय, तृतीय व उत्तेजनार्थ आलेल्या अनुक्रमे सुनील म्हसकर, सागरराजे निंबाळकर, देवभाऊ उबाळे, प्रसाद फर्डे, सुरेखा गायकवाड, वसंत हिरे यांना सन्मान चिन्ह, मानपत्र, ज्ञानेश्वरी, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी शहापूर – मुरबाड रहिवासी संघाचे अध्यक्ष किसन बोन्द्रे, कल्याण तालुका काँग्रेस अध्यक्ष परशुराम पितांबरे, सोनुभाऊ बसवंत महाविद्यालयाचे संचालक विनायक सापळे, ‘प्रहार’चे तालुका कार्याध्यक्ष धनंजय धसाडे, सेवा निवृत्त पोलीस अधिकारी वसंत भेरे, वैशाखरे येथील माजी सरपंच विलास घरत,आदर्श सरपंच चंदू कापडी, डॉ दिलीप धानके यांचे जेष्ठ पुत्र रोहन धानके,देवेन्द्र भेरे, लक्ष्मण घरत, रविंद्र परटोले, किरण केणे,चिंतामण वेखंडे,जयवंत विशे, सरस्वती विद्यालयाचे सहशिक्षक श्याम शेलार आदी मान्यवर उपस्थित होते! परीक्षक म्हणून जेष्ठ कवी केशव शेलवले तर युवा कवी प्रकाश फर्डे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन भास्कर जाधव,धनश्री पाठारी,वैशाली घरत यांनी केले. तर संमेलन यशस्वी करण्यासाठी महेश धानके यांच्या सर्व परिवारासह लक्ष्मण घरत,रवींद्र परटोले,रामचंद्र जोशी आदींनी विशेष परिश्रम घेतले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून सदर राज्यस्तरीय काव्यसंमेलन यशस्वीपणे पार पडले. कवी ‘शारदासुत’ सुनील म्हसकर यांच्या या देदीप्यमान कामगिरीबाबत त्यांचे शहापूर तालुक्यातूनच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून अभिनंदन करण्यात येत आहे!
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा