जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी भोईटी या गावातील शेतकऱ्यांनी सुरुवातीला झालेल्या पावसानंतर आपल्या शेतात पेरणी केली. पेरणीनंतर पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे मोठं संकट उभ टाकलं होतं.
धुळे: जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी भोईटी या गावातील शेतकऱ्यांनी सुरुवातीला झालेल्या पावसानंतर आपल्या शेतात पेरणी केली. पेरणीनंतर पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे मोठं संकट उभ टाकलं होतं. परंतु दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी तरुण शेतकऱ्याने एक शक्कल लढविली आहे.
शेतकऱ्यांसमोर पीक वाचवण्याचं आव्हान
शिरपूर तालुक्यात जून महिना उलटल्यानंतरही म्हणावा तसा पाऊस झाला नसल्यामुळे पेरणी करून देखील शेतकऱ्याच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. शिरपूर तालुक्यातील रोहिणी भोईटी या ठिकाणच्या विणेश पावरा या तरुण शेतकऱ्याने आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये कपाशीची लागवड केली. परंतु पेरणीनंतर पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले होते. परंतु विणेश पावरा या तरुण शेतकऱ्याने दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवत पिकाला पाणी देण्याची व्यवस्था केली.
संपूर्ण 1 एकर क्षेत्रामध्ये कपाशी पेरल्यानंतर कपाशीच्या बी मधून कोंब देखील बाहेर आल्याने शेतकऱ्याने प्रत्येक कपाशीच्या जवळ एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पाणी भरून त्या पिशवीला बारीक छेद करून त्यातून रोपाला जीवदान मिळेल इतके पाणी टिपटिप पिकाला मिळू लागले.
पीक जगवण्यात यश
पावसाने दडी मारल्यानंतर तब्बल आठ दिवस हा प्रयोग यशस्वी ठरला. पिशवी मधून मिळणाऱ्या थेंब-थेंब पाण्यामुळे कपाशीच्या बी मधून निघालेले कोंब काही इंच मोठे देखील झाले. त्यानंतर अचानक काल व आज पावसाचे आगमन झाल्यानंतर पावसाचे पाणी देखील पिकास मिळाल्याने तरुण शेतकऱ्यांनी लावलेली शक्कल यशस्वी ठरली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी पिकाला मिळू लागल्यामुळे शेतात ठेवलेल्या पाण्याने भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या शेतकऱ्याने काढून टाकल्या आहेत.
तूर्तास तरी दुबार पेरणीचे संकट टळलं असलं तरी यापुढेतरी पीक टिकविण्यासाठी समाधानकारक पाऊस होणं शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच असणार आहे
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा