देश-विदेशमहाराष्ट्र
चार टप्प्यांत शिथिल होणार लॉकडाउन? दुकानांची वेळ 7 ते 2 पर्यंत
सध्या राज्यात कठोर निर्बंध लागू आहेत. दुकानं केवळ सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरू ठेवण्याची मुभा आहे. याचा परिणाम अनेक ठिकाणी दिसून आला आहे.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. एप्रिल महिन्यात राज्यात दररोज ७० हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत होते. आता हाच आकडा ३० हजारांच्या खाली आला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण काहीसा कमी झाला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील रविवारी माध्यमांशी बोलताना लॉकडाऊनबाबत महत्वाची माहिती दिली होती.

मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक या मोठ्या शहरांमधील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत लक्षणीय घटली आहे. कोरोना रुग्ण वाढीचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे या शहरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र ग्रामीण भागांत कोरोनानं हातपाय पसरले आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना आरोग्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण संकेत दिले. ‘१ जूनपासून निर्बंध टप्प्याटप्प्यानं शिथिल केले जातील. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असलेल्या जिल्ह्यांमधील निर्बंध हळूहळू मागे घेतले जातील, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
—————— जाहिरात —————-

सध्या राज्यात कठोर निर्बंध लागू आहेत. दुकानं केवळ सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरू ठेवण्याची मुभा आहे. याचा परिणाम अनेक ठिकाणी दिसून आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. मुंबईसह एमएमआर रिजनमधील स्थिती नियंत्रणात आहे. नाशिक, नागपूरमधील परिस्थितीदेखील चिंताजनक नाही. त्यामुळे या भागातील निर्बंध १ जूनपासून हळूहळू शिथिल केले जातील. निर्बंध एकदम मागे घेण्याऐवजी टप्प्याटप्यानं मागे घेतले जातील. कोरोना रुग्णसंख्या कमी झालेल्या जिल्ह्यांसाठी या प्रकारचे निर्णय घेतले जातील, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.




