पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांना फोन; राज्यातील पूरस्थितीचा घेतला आढावा
नवी दिल्ली : राज्यात चौफेर आज दिवसभर पावसानं थैमान घातलं. मुसळधार पावसामुळं सर्वाधिक फटका कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि कोल्हापूर जिल्ह्यांना बसला आहे. अनेक लोक ठिकठिकाणी अडकून पडली आहेत. एक दोन ठिकाणी व्यक्ती पाण्यात वाहून गेल्याचं वृत्तही आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन राज्यातील पावसाचा आणि पूरस्थितीचा आढावा घेतला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधून महाराष्ट्रातल्या काही भागातला पूर आणि मुसळधार पाऊस याबाबत चर्चा केली. या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आणि सुखरूपतेसाठी प्रार्थना करीत आहे @OfficeofUT
— Narendra Modi (@narendramodi) July 22, 2021
फोनवरील या चर्चेनंतर पंतप्रधानांनी ट्विट केलं. यामध्ये “महाराष्ट्रात पूरस्थितीमुळे आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे. तसेच मी सर्वांच्या सुरक्षेची आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो,” असंही मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांमध्ये पावसामुळं निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या आढाव्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. यावेळी या जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना इथल्या परिस्थितीची माहिती दिली.
या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थान विभागाला कामाला लागण्याचे आदेश दिले. चिपळूण, रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड जिल्ह्यांमध्ये या विभागाची पथकं रवाना करण्यात आली आहेत.



