कृषीवार्ता
शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आकाशाकडे!
खान्देशात मृग नक्षत्रात पाऊस झाला नसल्याने यंदा सुरवातीपासूनच शेतकऱ्यांना आकाशाकडे पाहावे लागत आहे. बागायतदार शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कापूस पिकाची लागवड केली आहे. दरम्यान कोरडवाहू क्षेत्रात अद्याप लागवडी योग्य पाऊस झाला नाही. शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा सुरवातीपासूनच करावी लागत आहे.

कोरडवाहू शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून लागवड व पेरणीसाठी लगबग करून क्षेत्र तयार करून ठेवले आहे. आठवडाभरापासून आकाशात ढग भरून येतात दिवसभर उकाडा होतो. सायंकाळी चारनंतर आकाश निरभ्र होते, जोरदार वारा वाहू लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. दोंडाईचा परिसरातील अत्यल्प प्रमाणावर बागायत क्षेत्र आहे. बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असल्याने खरीप हंगाम पूर्णतः पावसाळ्याच्या पाण्यावर अवलंबून आहे.
धुळे जळगाव जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांनी कापूस लागवड करून टाकली आहे. आता मात्र लागवड केलेल्या कापूस क्षेत्राला पाण्याची आवश्यक आहे. विहिरींनी तळ गाठलेला आहे. ७ जूननंतर पाऊस पडतो ती अपेक्षा फोल ठरली आहे. जो दिवस येतो तो तसाच निघून जातो. असे चित्र असल्याने शेतकऱ्यांच्या नजर आकाशाकडे लागलेले आहेत. मृग नक्षत्रात पेरणी लागवड झालेली पीक निरोगी असतात, असे शेतकरी सांगतात.




