लासलगाव : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना भाजप -शिवसेनेच्या युतीची आठवण करून दिली. आगामी मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपने कंबर कसली असली तरी शिवसेनेनेही युद्धपातळीवर तयारीला सुरुवात केली आहे. मुंबई ही मराठी माणसांची आणि शिवसेनेची आहे.
शिवसेना आणि मुंबईचे नाते १९६६ पासून आहे. मुंबईत शिवसेनाप्रमुख नसते तर काय झाले असते, हे गुलाबराव पाटलांनी सांगण्यापेक्षा भाजप नेते चंद्रकांत पाटलांना जास्त माहिती आहे. ही पाच वर्षे सोडली, तर पंचवीस वर्षे भाजप आणि शिवसेनेचे लव्ह मॅरेज होते, अशी आठवण पाटील यांनी करून दिली.
पाच राज्यांच्या निकालांमध्ये चार राज्यांत भाजपाला दणदणीत यश मिळाले. मात्र त्याचा फारसा परिणाम शिवसेनेवर पडणार नाही. मुंबई महानगरपालिकेत गेल्या पाच वर्षांत युती न करता शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढली. देशात सर्वाधिक भाजपचे मुख्यमंत्री असतानाही मुंबईचा महापौर शिवसेनेचा होता. मुंबई महानगरपालिकेसाठी चंद्रकांत पाटलांनी तयारी करावी. तुम्हीही पहिलवान आहात, आम्हीही पहिलवान आहोत, असा इशाराही गुलाबराव पाटलांनी दिला आहे.
तसेच आज मी जे काही आहे ते बाळासाहेब ठाकरेंमुळेच आहे, असेही पाटील म्हणाले. १९८२ साली मी पानटपरी आणि व्हिडीओ चालक होतो. शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने मंत्रिपदापर्यंत पोहचलो, अशा आठवणींना त्यांनी उजाळा दिला. राजकीय नेत्यांनी चार लोकांशी नाते घनिष्ठ करायला हवे.
पहिले शेतकरी, दुसरे पोलीस, तिसरे व्यापारी आणि चौथे डॉक्टर. ही मतांची ब्लड बँक आहे. पोलिसाला फोन करून एक मोटरसायकल सोडल्यास दोन मते पक्की होतात. डॉक्टरांना फोन करून बिल कमी केले, तर १० मते पक्की होतात. एका शेतकऱ्याची विजेची लाईन जोडून दिली, तर ५० मते मिळतात. व्यापाऱ्याला त्रास नाही दिला, तर पुड्या बांधता बांधता १०० मते पक्की होतात, असे असले तरी माणसांची भावना कार्य करण्याची असायला हवी, असे पाटील म्हणाले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा