…आता संभाजीराजे यांचे लक्ष्य २०२४ ची निवडणूक,
झूम मराठी वृत्तसेवा
राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी ‘स्वराज्य संघटने’च्या बांधणीसाठी एकदा महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे जाहीर केले. माझी ताकद मला बघायची आहे. माझी ताकद ४२ आमदार नाही, जनता आहे, म्हणून मी जनतेत जात आहे. माझा दौरा उद्यापासूनच सुरू होईल, असे ते म्हणालेत. आता राजेंचे लक्ष्य २०२४ ची निवडणूक आहे, अशी राजकारणात चर्चा सुरू झाली आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा करताना संभाजीराजे म्हणालेत की, स्वराज्य बांधण्यासाठी मी आता सज्ज झालो आहे. विस्थापित मावळ्यांना संघटित करण्यासाठी मी मोकळा झालो आहे. २००९ ची लोकसभेची निवडणूक मी हरल्यानंतर पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. लोकांनी प्रेम दिले. शेतकरी, कामगार, कष्टकरी, युवकांना सगळ्यांना मी संघटित करावे, अशी लोकांची इच्छा होती. आज ती संधी आली आहे.
शिवसेनेत प्रवेश केल्याशिवाय राज्यसभेच्या उमेदवारीसाठी पाठिंबा देण्यास शिवसेनेने नकार देण्याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात राजे म्हणालेत, माझ्या मनात कुणाबाबतही द्वेष नाही. मला कुणाही पुरस्कृत करावे, असे मी म्हटले नव्हते. अपक्ष म्हणून पाठिंबा द्या, असे सर्वांना आवाहन केले होते.



