स्वातंत्र्यदिनी जळगावच्या शेतकऱ्याचा मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल टाकत आत्महत्येचा प्रयत्न!
आज स्वातंत्र्यदिनी जळगावच्या शेतकऱ्याचा मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल टाकत आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच त्या शेतकऱ्याला ताब्यात घेतल्यानं पुढील अनर्थ टळला. सध्या या शेतकऱ्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर काही वेळानंच हा प्रकार घडल्यानं खळबळ उडाली. या शेतकऱ्यानं असं का केलं याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
नाईलाजाने लॉकडाऊन लावावं लागेल- मुख्यमंत्री
ध्वजारोहनावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, अजूनही कोरोनाचं संकट घोंघावतंय. आपण कोरोनाचा कहर अनुभवलाय. आरोग्य सुविधा आपण वाढवतोय. आता आपण शिथीलता देत असताना ऑक्सिजनचा पुरवठा ठरवून आपण शिथिलता देत आहोत. ज्यावेळी असं लक्षात येईल, की ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतोय, त्यावेळी आपल्याला नाईलाजाने लॉकडाऊन लावावं लागेल, असं म्हणाले. राज्यात लसीकरणाने वेग घेतलाय. काल राज्यभरात साडे नऊ लाख लोकांचं लसीकरण झालं आहे. हा राज्यात लसीकरणाचा उच्चांक आहे. आपण एक निश्चय करु, मी माझं राज्य, देश कोरोनामुक्त करणारच, असं ठाकरे म्हणाले.
मात्र कोरोनाचं संकट अद्याप गेलेलं नाही
महाराष्ट्रात उद्यापासून आपण अनेक निर्बंध शिथिल करत आहोत. मात्र कोरोनाचं संकट अद्याप गेलेलं नाही. त्यामुळं काळजी घेणं आवश्यक आहे. आता आपण निर्बंध शिथिल करतोय मात्र पुन्हा लॉकडाऊन लावावा लागू नये, यासाठी आतापासून खबरदारी घ्या, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण झालं. त्यावेळी त्यांनी जनतेला संबोधन केलं.




