महाराष्ट्र
….आणि चितेवरच्या आजीबाई झाल्या जिवंत!
अग्नी देण्याचा विधी सुरु होण्यापूर्वीच जिजाबाई यांच्या डोळ्याची हालचाल होतांना काहींच्या लक्षात आले
आईला सरणावर ठेवल्यानंतर पाणी पाजताना आईने डोळा उघडला. मी आईच्या तोंडात ठेवलेला विडा काढल्यानंतर तिने घटाघटा पाणी प्यायले. लगेच आईला सरणावरुन काढून कन्नडच्या खाजगी दवाखान्यात आणले. आता आई बोलत असल्याची माहिती त्या म्हातारीचा मुलगा माजी नगरसेवक विलास गोरे यांनी दिली.
चितेववरील व्यक्ती अचानक उठून बसतो हे अनेकदा आपण चित्रपटात पाहतो, मात्र औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात अशी घटना प्रत्यक्षात समोर आली आहे. कन्नड तालुक्यातील अंधानेर गावातील एक ८० वर्षीय महिला चितेवर जिवंत झाल्याची घटना सोमवारी रात्री ८.३० वाजता समोर आली. त्यामुळे दुःखाच डोंगर कोसळलेल्या कुटुंबीयांना या घटनेमुळे सुखद धक्का बसला आहे. त्यांनतर या वृद्ध महिलेला उपचारासाठी डॉक्टरांकडे नेण्यात आले. जिजाबाई गोरे असे या महिलेचे नाव असून,सोमवारी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. त्यानंतर नातेवाईक आणि मित्र परिवाराला निधनाची माहिती देऊन, अंत्यविधीची तयारी करण्यात आली. ठरलेल्या वेळेनुसार 7 वाजता अंत्ययात्रा काढण्यात आली. गावातील रचलेल्या सरणावर सदर महिलेचा देह ठेवण्यात आले. अग्नी देण्याचा विधी सुरु होण्यापूर्वीच जिजाबाई यांच्या डोळ्याची हालचाल होतांना काहींच्या लक्षात आले.त्यामुळे तात्काळ अग्नी विधी थांबवण्यात आली.
त्यानंतर कुटुंबीयांसह नातेवाइकांनी त्यांना चितेवरून खाली उतरविले आणि त्वरित रात्री जवळपास साडेनऊच्या सुमारास कन्नड येथील डॉ.मनोज राठोड यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तपासणी केली असता त्या धडधडीत जिवंत असून, त्यांचे हृदय सुरू असल्याचे दिसून आले. मात्र, त्या ब्रेन डेड असून कोमात गेल्याचे डॉक्टरांनी कुटुंबीयांनी सांगितले. यानंतर डॉक्टरांनी कुटुंबीयांनी वृद्धेला घरी घेऊन जाण्यास सल्ला दिला.




