राज्य सरकारने वाचलेले सात हजार कोटी गरीबांना द्या : खासदार खडसे
सावदा (जळगाव) : देशातील १८ वर्षांवरील सर्वांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. यात राज्य सरकारचे सात हजार कोटी वाचले असून, ही वाचलेली रक्कम पॅकेज स्वरूपात जाहीर करून गरीबांना द्यावी; अशी मागणी भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ठाकरे सरकारकडे केली आहे.
एक रकमी धनादेश देऊन लस खरेदी करण्याची तयारी दाखविणाऱ्या ठाकरे सरकारनेच राज्य सरकारच्या तिजोरीतून वाचलेल्या सात हजार कोटींच्या निधीतून आता गोरगरीब जनता, शेतकरी, बारा बलुतेदार, रिक्षा- टॅक्सीचालक, मजूर, केश कर्तनालयांचे चालक तसेच टाळेबंदीच्या काळात रोजगारास मुकलेल्या सर्वांकरिता तातडीने पॅकेज जाहिर करावे असे खासदार खडसे यांनी पत्रकात म्हटले आहे.
लसीकरणाचा खेळखंडोबा संपणारदेशातील लसीकरण मोहिमेची सूत्रे केंद्र सरकारने हाती घेतल्याने राज्यातील लसीकरणाचा खेळखंडोबा संपणार आहे. सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारने उचलल्याने देशातील जनतेस मोठा दिलासा मिळणार आहे; असे स्पष्ट करून खासदार रक्षा खडसे यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार व्यक्त केले आहेत.



