हमीद मुक्ता गटाने महाराष्ट्र अंनिसचे नाव वापरू नये – कार्याध्यक्ष अविनाश पाटील
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकारातून स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीतील वाद चव्हाट्यावर आला आहे.
नंदुरबार : डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र विश्वस्त संस्था हमीद मुक्ता दाभोळकर कुटुंब यांच्या प्रभावामुळे संघटनेच्या विरोधात गेली आहे. हमीद मुक्ता गटाने सात कोटी रुपये असलेला संघटनेचा ट्रस्ट आपल्या ताब्यात घेतली आहे. दरम्यान, त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नाव वापरू नये, असे आवाहन कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले आहे.
यासंदर्भात अविनाश पाटील यांनी म्हंटले की, संघटनेतील सर्व कार्यकर्त्यांनी गेली 25 वर्षे देणगी आणि जाहिरातीच्या माध्यमातून अत्यंत कष्टाने मिळवलेली आणि काटकसर करून साधारण सात कोटी रुपयांची रक्कम जमा केली असून ही रक्कम अंधश्रद्धा निर्मूलन समिती विश्वस्त संस्थांमध्ये आहे. डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र विश्वस्त संस्था हमीद मुक्ता दाभोळकर कुटुंबीयांच्या प्रभावामुळे संघटनेच्या विरोधात गेली आहे. हमीद मुक्ता गटाने सात कोटी रुपये असलेल्या संघटनेचा ट्रस्ट आपल्या ताब्यात घेतला असून त्यादरम्यान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघटनेने आर्थिक व्यवहारासाठी विवेक जागा संस्था गठित करून आपले कामकाज सुरू ठेवले आहे
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी अध्यक्ष उपाध्यक्ष ही सन्मानाची पदे असून कार्याध्यक्ष प्रधान सचिव, सरचिटणीस, विविध सतरा विभागांचे कार्यवाह, सहकार्यवाह ही कार्यकारी आणि दैनंदिन जबाबदारी असलेली पदे आहेत. महाराष्ट्र आणि संघटनेची राज्य कार्यकारणी दर तीन वर्षांनी निवडली जाते. सध्याच्या कार्यकारणीची निवड भोर येथे २०१९ रोजी झाली. ही निवड भाई एन.डी. पाटील यांच्या मार्गदर्शनात केली आहे. समितीचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या एन.डी. पाटील यांची यावेळी अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड झाली. त्यात माझी (अविनाश पाटील) राज्य कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली. तसेच अन्य पदाधिकारी यावेळी निवडले गेले. त्यात उपाध्यक्ष डॉ. प्रदीप पाटकर पनवेल, उत्तम कांबळे नाशिक, महादेवराव भुईभार अकोला, शामराव पाटील इस्लामपूर, सुरेश खुरसाळे आंबेजोगाई, राज्य प्रधान सचिव माधव बागवे लातूर, सुशीला मुंडे नवी मुंबई, संजय बनसोडे इस्लामपूर, गजेंद्र सुरकार वर्धा, नंदकिशोर तळाशीलकर मुंबई, राज्य सरचिटणीस नितीन राऊत अलिबाग, सुरेखा भापकर डोंबिवली, शहाजी भोसले औरंगाबाद, हरिदास तन्मवार लातूर, विनायक सावळे शहादा, ठकसेन गोराणे नाशिक, संजय शेंडे नागपूर, बबन कांकिरड अकोला, सुधाकर काशीद मोहोळ, कृष्णात कोरे कोल्हापूर तसेच राज्यस्तरीय सतरा विविध विभागांचे ५२ राज्य कार्यवाह व राज्य सहकार्यवाह निवडले. या एकूण पंचायतीत ७५ पदाधिकाऱ्यांपैकी ५६ आजही पदावर कार्यरत आहेत. राज्य कार्यकारिण प्रमाणे ३६ जिल्ह्याच्या जिल्हा शाखांची रचना आहे. राज्यातील ३५० पेक्षा अधिक शाखांच्या कार्यकारणीची रचना राज्य जिल्हा कार्यकारणी प्रमाणे आहे. ५६ राज्य पदाधिकारी १०८ जिल्हा अध्यक्ष कार्याध्यक्ष, प्रधान सचिव, एक हजार ५० हून अधिक शाखा अध्यक्ष, कार्याध्यक्ष सचिव आहेत. शाखापासून राज्यापर्यंत १३०० हून अधिक जणांची टीम संघटनेसोबत आहे.
अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यातील सक्रिय कार्यकर्ते यांतील ९० टक्के कार्यकर्ते संघटनेसोबत आहेत. राज्यातील अशा सक्रिय कार्यकर्त्यांची संख्या दहा हजाराहून अधिक आहे. भाई एन.डी. पाटील संस्थापक अध्यक्ष असलेली डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेली आणि मी (अविनाश पाटील) कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत राहिलेले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघटना सक्रिय आहे.
अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करण्यासाठी व्यापक प्रयत्न आणि संघटनांची गरज आहे. असे संघटनात्मक काम हमीद मुक्ता गटाने करावे. त्यासाठी नवीन संघटना स्थापन करावी. पण, आधीपासून कार्यरत असलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नाव वापरून समान कार्यपद्धती अवलंबू नये. प्रत्यक्षात स्वतः काहीही काम न करता, काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करून संघटित कार्यकर्त्यांच्या कामाचे श्रेय घेऊ नये. खरे तर समाज परिवर्तनाच्या चळवळीत कार्यकर्त्यांना देण्यासारखे फार काही नसते, त्यातल्या योगदानाची श्रेया हेच एकमेव असते. त्यातून त्यांना ऊर्जा मिळते. असे संघटित कार्यकर्त्यांच्या कामाचे श्रेय कोणत्याही प्रकारे हिरावले जाऊ शकत नाही, असा आशावाद महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विवेक जागरचे अविनाश पाटील यांनी व्यक्त केला आहे.



