Chalisgoan | उद्यानातील अवैध वृक्षतोड प्रकरणी जबाबदार त्या अधिकाऱ्यांची राष्ट्रीय जनमंच पक्षाची जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार..!
चाळीसगाव येथील स्व. सुवर्णाताई देशमुख उद्यानामध्ये ३० ते ४० वर्षे जुनी मोठी झाडे दिनांक २५ जून रोजी बेकायदेशीररीत्या तोडण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात राष्ट्रीय जन मंच पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप लांडगे यांनी सह आयुक्त, नगरपालिका प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत पर्यावरणीय दृष्टीने संवेदनशील असलेल्या या घटनेबाबत खालील महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत.
परवानगीचा अभाव: उद्यानातील झाडे तोडण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्याची किंवा विभागाची परवानगी घेण्यात आली, याबाबत माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच त्या मंजुरीचे लिखित पुरावे मागण्यात आले आहेत, कायदेशीर आधारे ही झाडे कोणत्या कायदेशीर अधिकाराअंतर्गत कापली गेली, हे स्पष्ट करण्याची मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे. संबंधित ठेकेदाराची पारदर्शकता: झाडकाटीचे काम नेमकं कोणत्या ठेकेदाराकडे देण्यात आले, त्याचे नाव, नोंदणी क्रमांक व त्याला दिलेल्या रकमेची माहिती मागविण्यात आली आहे.
जनतेसमोर खुलासा: माध्यमांतून या कारवाईबाबत काही निवेदन दिले असल्यास, त्याची प्रत सादर करावी, अशीही विनंती करण्यात आली आहे. वनविभागाची मंजुरी: झाडे कापण्यापूर्वी वनविभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र (NOC) घेतले गेले होते का, यावर खुलासा करण्याची मागणी केली आहे. इतर संस्थांशी संवाद: पर्यावरणप्रेमी संस्था, राजकीय पक्ष यांच्याशी काही पत्रव्यवहार झाला असल्यास, तो देखील सार्वजनिक करावा, असे निवेदन करण्यात आले आहे.
संदीप लांडगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “या झाडांची अवैध कत्तल ही पर्यावरणीय कायद्यांचे व नैतिकतेचे उल्लंघन आहे. यामागे कोणतीही परवानगी किंवा कायदेशीर प्रक्रिया न पाळता, जनतेच्या विश्वासाला तडा देणारी ही कृती आहे.” तसेच, त्यांनी इशारा दिला की, “जर प्रशासनाने याप्रकरणी योग्य माहिती व पुरावे दिले नाहीत, तर पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ आणि महाराष्ट्र झाडे संरक्षण अधिनियम १९७५ अंतर्गत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.” हा प्रकार केवळ उद्यानातील सौंदर्य व हिरवळ नष्ट करणारा नाही, तर भविष्यातील पिढ्यांच्या पर्यावरणीय अधिकारांवर घाला घालणारा आहे.



