आपल खान्देश

खानदेशातील उद्योग व्यवसायातील विकासाची होणारी पिछेहाटीस जबादार कोण ? 


स्वातंत्र्यतोत्तर काळात बरेच उद्योग खान्देशात उदयास आले बरेच बंद ही पडले, तर काही धुगधुगीत आहेत. यातील बरेच उद्योग सहकार तत्त्वावर तर काही उद्योग खाजगी तत्त्वावर होते, उदा प्रताप शेटजी,  महामानव निर्मितउद्योग, पाचोऱ्यातील मानसिंगा वनस्पती तूप उद्योग हे सर्व उद्योग बंद पडे पर्यंत खान्देशातील जनता व नेते मंडळी काय करत होते ? खान्देशातील हे सर्व उद्योग बंद का पडताहेत हे प्रश्न कुणालाच का पडले नाहीत? प्रश्न पडले असतील तर आंदोलन का उभी राहिली नाहीत ?

यावर खांदेशातील जनतेने सर्व सर्व राजकीय पक्षांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. या गोष्टीकडे राजकिय दृष्टीने, हेतूने पाहू नका. विकास होत असताना. तो खंडित का झाला? उद्योग उभारून बंद पडले की, बंद पाडले गेले? बंद पाडले गेले तर का बंद पाडले गेले? या मागचा हेतू काय होता? नवीन उद्योग का आले नाहीत? या उद्योगांना सहकार्य व जीवित करण्यासाठी संजीवनी का मिळाली नाही? आर्थिक साहाय्य का दिले गेले नाही? असे अनेक प्रश्न जनतेच्या मनात आहेत…

सर्वच राजकीय पक्षातील मंडळी आपले अपयश लपविण्यासाठी नको ते मुद्दे चर्चेत आणून जनतेची दिशाभूल करत आहे. पण आपले उद्योग का बंद पडले यावर कोणी बोलत नाही. आपले अपयश झाकून ठेवून मतदारांची दिशाभूल करत आहेत. राजकीय सहकार तत्त्वावर उद्योग उभारून मलई खाऊन स्वतःचा फायदा करून उद्योग बंद पाडून लाखो लोकांच्या हातचे काम गेल्याने सर्व खान्देशातील जनता, कोट्यवधी लोक मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, गुजरात राज्यात कांम धंद्यासाठी गेले आहेत. याला राजकीय लोकांचा नाकर्तेपणा आणि विकासाकडे दुर्लक्ष कारणीभूत आहेत. 

याउलट संयुक्त महाराष्ट्र झाल्या नंतर इतरही राज्य महाराष्ट्र पेक्षा वीज, पाणी, उद्योग बाबत मागासलेले होते. परंतु तिथल्या सर्वच पक्षाच्या काँग्रेस, भाजप राज्यकर्त्यांनी सत्तेत आल्यावर राज्याचा विकास, उद्योग धंदे, व्यापार, रोजगार यावर लक्ष केंद्रित करून आपापली राज्य ७५ वर्षात निस्वार्थपणे सक्षम असा विकास घडवून आणला आहे. खान्देशातील लोकांच्या हाताला काम नसल्याने सध्याच्या परिस्थितीत अनेक कुटुंब कर्जबाजारी, दारिद्रय रेषेखालील जिवन जगत आहेत. शेतीला भांडवल नाही त्यामुळे अनेक शेतकरीं आत्महत्या करतात. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालीत. जो पर्यंत खान्देशातील उद्योग सुरू होते तो पर्यंत लोकांना काम मिळाले राजकीय लोकांनी आर्थिक स्वार्थासाठी उद्योग बंद केले आणि नवीन उद्योगांची उभारणीच केली नाही. म्हणून आपला खान्देश हा उद्योगांच्या बाबतीत मागासलेला राहिला एमआयडीसी ओस पडल्या आहेत.

जनतेला सर्व वास्तव परितिस्थिती माहीत आहे. मतदार स्वतःअनुभव घेत आहेत. राजकीय लोकांच्या भूलथापंना मतदारानी बळी पडू नये उलट लोकांना या बाबतीत प्रश्न विचारावेत कारण खान्देशातील राजकीय लोकांच्या अकार्यक्षमता, विकासाकडे असलेले दुर्लक्ष, चुकीचे, गलिच्छ राजकारण, राजकारणात एकमेकांना कमी दाखवण्यासाठी घसरलेली राजकीय पातळी. दूरदृष्टीचा अभाव वीज, पाणी बाबत नियोजन शून्य कारभार यामुळे खान्देशातील जनतेला उदरनिर्वाहासाठी इतरत्र स्थलांतरित व्हावे लागत आहे. असे स्पष्ट मत कान्हदेश चेम्बर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष विकास पाटील यांनी मांडले  

खान्देशातील बंद पडलेली उद्योग…

  1. जळगाव जिल्हा
  • अमळनेर प्रताप मिल यंत्रे, जमीन विकून नामशेष झाली.
  • प्रताप हॉस्पिटल बंद पडले. सर्व नामशेष केले.
  • पाचोऱ्यातील मानसिंगा डालडा वनस्पती तूप कारखाना पूर्णपणे बंद.
  • अमळनेर डालडा कारखाना ऑक्सिजवर आहे.
  • जळगाव टेक्सटाइल कापड मिल बंद पडली.
  • चोपडा साखर कारखाना ऑक्सिजनवर.
  • न्हावी यावल साखर कारखाना अस्वस्थ आहे
  • कासोदा साखर कारखाना बंद पडला.सर्व विकले गेले.
  • बेलगंगा साखर कारखाना चाळीसगाव बंद पडला सर्व विकले गेले.
  • जळगाव दूध संघ बंद पडला जळगाव जिल्ह्यातील सर्वच दूध संघ जवळ जवळ बंद…
  • चाळीसगाव टेक्सटाइल कापड मिल बंद पडली
  • अमळनेर प्रताप कॉलेज आणि हायस्कूलचे गुणवत्ता घसरली आहे

धुळे जिल्ह्यातील बंद

  • उद्योगनवलनगर साखर कारखाना पत्रे, यंत्र, विकली गेली
  • टेक्सटाइल कापड मिल धुळे सर्व यंत्र ही विकली गेली
  • जिल्हा दूध संघ पूर्णपणे बंद..
  • शासकीय कोल्ड स्टोअर व दूध डेअरी बंद
  • तेल रिफायनरी, तेल बिया कारखाना
  • महिला सुत गिरणी अजंग ता.धुळे बंद पडली.
  • रोटो रेशन गिरणी गरताड बंद पडली
  • सूतगिरणी सोनगीर बंद
  • साक्री साखर कारखाना बंद सर्व विक्री झाले
  • शिरपूर दहीवद साखर कारखाना ऑक्सिजवर चालू आहे
  • शिरपूर दूध संघ, शिंदखेडा दोंडाईचा साखर कारखाना बंद पडून पत्रे विकली गेली.
  • दोंडाईचा दूध संघ बंद पडला

नंदुरबार जिल्हा

  • पुरुषोत्तम साखर कारखाना शहादा पि के पाटील जेमतेम चालू आहे
  • पुरुषोत्तम पेपर मिल शहादा बंद
  • शहादा दूध संघ बंद
  • जय प्रकाश नारायण सुत गिरणी शहादा ऑक्सिजनवर चालू

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे