आपल खान्देशगुन्हेगारी
अनलॉक मोबाईल, त्यात गुगल पे, चोरट्याने पाच मिनिटात बँक खातं रिकामं केलं
झूम मराठी न्यूज वेब मीडिया
कल्याण (ठाणे) : मोबाईलमध्ये तुम्ही गुगल पे वापरत असाल तर सावधान! कारण डोंबिवलीत एका चोरट्याने प्रवासा दरम्यान प्रवाशाचा मोबाईल चोरला. मोबाईल अनलॉक असल्याने ‘गुगल पे’चा वापर करून त्याने अवघ्या पाच मिनिटात त्या प्रवाशाच्या खात्यातील सर्व पैसे स्वत:सह पत्नीच्या नावाच्या खात्यावर ट्रान्सफर केले. अखेर या चोरट्यासह त्याच्या पत्नीला कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी अटक केली आहे
नेमकं प्रकरण काय?
डोंबिवलीत राहणारे ऋषभ शहा हे मुंबई येथील एका ज्वेलर्स तयार करणाऱ्या दुकानात काम करतात. ते 19 जून रोजी मुंबईहून डोंबिवली रेल्वेने येत होते. डोंबिवली स्थानकात आल्यावर त्यांना कळाले की, त्यांचा मोबाईल चोरीला गेला आहे. इतकेच नाही तर त्यांच्या खात्यातून 23 हजार रुपयांची रक्कम काढली गेली आहे. हे पैसे दोन खात्यात ट्रान्सफर झाले आहेत. ऋषभ यांनी मोबाईल चोरीची तक्रार डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात दिली
आधी मोबाईल चोरी
या प्रकरणाचा तपास समांतर पद्धतीन कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचही करीत होते. क्राईम ब्रांचचे सहाय्यक पोलीस निरिक्षक अरशद शेख यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. तपासात ऋषभ शहा यांच्या मोबाईलमध्ये गुगल पे अॅप होता. त्यात कोडपण सेव्ह होता. त्याच आधारे मोबाईल चोरट्याने आधी मोबाईल चोरी केला. त्यानंतर त्याने मोबाईलमधील गुगल पेचा वापर करीत दोन अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सर केले.
पोलिसांनी कारवाई नेमकी कशी केली?
पोलिसांनी संबंधित खात्यांची चौकशी सुरू केली. या खात्यातून 7 हजार रुपये सबिना शेख या महिलेच्या खात्यावर ट्रान्सफर झाले होते. पोलिसांनी सगळ्यात आधी सबिनाला शोधून काढले. सबिना ही मुंब्रा येथे राहत होती. तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि खुलासा झाला की, सबिना ही त्या मोबाईल चोरट्याची पत्नी आहे ज्याने ऋषभचा मोबाईल चोरी केला होता.
अखेर चोरटा जेरबंद
सबिना हिला रेल्वे क्राईम ब्रांचने अटक करुन डोंबिवली जीआरपीकडे दिले. तिचा चोरटा पती कासीम हा फरार होता. अखेर कासीम शेखला आज रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला डोंबिवली जीआरपीच्या हवाली केले असल्याची माहिती पोलीस अधिकारी अरशद शेख यांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की, मोबाईलमध्ये गुगल अॅप वापराताना त्याची सुरक्षितता बाळगणे किती महत्वाचे आहे.




