शिंदे गटाचे मंत्री भुमरेंच्या कार्यक्रमात फक्त दीडशे लोक; लोक म्हणाले, आदित्यच्या सभेला तुफान…
औरंगाबाद (झूम-वृत्तसेवा) औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचे मोठे वर्चस्व आहे. निम्म्यापेक्षा जास्त शिवसेना आमदार शिंदे गटात (Shinde Group) सामील झाल्याने शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागणार आहे. त्यातच शिंदे गटातील दोन आमदारांना मंत्रिपद मिळाल्याने याच आमदारांची जास्त चर्चा आहे. पण औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणमध्ये नुकताच एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात पैठणचे आमदार, मंत्री संदिपान भुमरे (Sandipanrao Bhumre) उपस्थित होती. आता मंत्रिपद मिळालेल्या भुमरेंच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी होणे अपेक्षित होते. पण पैठणमधल्या या कार्यक्रमात तर शंभर-दीडशेवर लोकही नव्हते. त्यामुळे शिंदे गटाच्या आमदाराची गर्दी अशी एकाएकी का ओसरली, अशी चर्चा आता जिल्ह्यात सुरू झालीय.
पैठणमध्ये संदिपान भुमरे यांना नुकत्याच झालेल्या विस्तारात रोहयो व फलोत्पादन मंत्रिपद मिळाले. त्यानंतर पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शनिवारी मंत्र्यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या मतदारसंघातील आमदाराला मंत्रिपद मिळाल्याने कार्यकर्त्यांची गर्दी अपेक्षित होती. किमान हजार जणांची गर्दी तरी या कार्यक्रमाला अपेक्षित होती. मात्र पैठणमधले चित्र शिंदे गटाला विचार करण्यास भाग लावणारे ठरले आहे.

शिंदे गटाने केलेले बंड मोडून काढण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी मागील महिन्यापासूनच निष्ठा यात्रेला सुरुवात केली आहे. औरंगाबादमध्ये आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) दौरा केला होता. यावेळी ज्या ज्या ठिकाणाहून आमदार शिंदे गटात गेले, तेथेच आदित्य ठाकरेंनी शिवसेना मेळावा घेतला. त्यामुळे पैठणमध्येही आदित्य ठाकरेंची जोरदार सभा झाली होती. या सभेसाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनी जंगी तयारी केली होती. त्यामुळे सभेला जोरदार गर्दी जमली होती. पण भुमरेंच्या कार्यक्रमाला आटलेली गर्दी पाहून जमलेल्यांना आदित्य ठाकरेंच्या मेळाव्यातली गर्दी आठवली.





