फार्मसी कॉलेज फैजपूरचा विद्यार्थी चिन्मय मिलिंद वाघुळदे यांची राष्ट्रीय युवा विनिमय कार्यक्रमासाठी निवड; केरळ येथे करणार प्रतिनिधित्व..

चेतना हिरे @ जळगाव
जळगाव | केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या ‘मेरा भारत युवा केंद्र’ या राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठामार्फत राबविण्यात येणाऱ्या आंतरराज्य युवा विनिमय कार्यक्रम २०२६ साठी जळगाव जिल्ह्यातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे चिन्मय मिलिंद वाघुळदे यांची निवड करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, त्यांच्या सोबत जिल्ह्यातील आणखी आठ युवकांचीही निवड झाली असून, एकूण नऊ युवकांचा हा गट या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. हा गट २२ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत Kerala राज्याच्या शैक्षणिक व सांस्कृतिक दौऱ्यावर जाणार असून, जळगाव जिल्ह्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. सदर दौरा कमलेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचा उद्देश विविध राज्यांतील युवकांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण वाढविणे, राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करणे, नेतृत्वगुणांचा विकास घडविणे तसेच सामाजिक जाणीव वृद्धिंगत करणे हा आहे. चिन्मय मिलिंद वाघुळदे यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, जिल्हाधिकारी रोहन घुगे तसेच जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चावरे यांनी त्यांचे अभिनंदन करून कौतुक केले आहे.
या निवडीमुळे जळगाव जिल्ह्याचा लौकिक राष्ट्रीय पातळीवर अधिक उंचावला असून, जिल्ह्यातील युवकांनी सामाजिक, शैक्षणिक व राष्ट्रउभारणीच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असा सकारात्मक संदेश या यशातून मिळत आहे.




