आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन झाले जागे…
झूम मराठी न्यूज नेटवर्क
पाचोरा : प्रतिनिधी, पाचोरा मतदार संघातिल महत्वाची कामे पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर सुरू न झाल्यास सत्तेत असुनही जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर सोमवार पासून उपोषणाला बसण्याचा आमदार किशोर पाटील यांच्या इशाऱ्याला प्रशासनाने गंभीर्याने घेऊन सुचवलेल्या कामांना सुरूवात केल्याने आज आमदार किशोर पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.

मागील वर्षी पाचोरा-भडगाव तालुक्यात महापुरात कजगाव येथील के.टी. वेअरसह अनेक तलाव, धरण आणि कालव्याचे नुकसान झाले होते. त्याची दुरुस्ती होत नसल्याने आमदार किशोर पाटील यांनी सोमवारपासून उपोषणाचा इशारा देताच प्रशासन यंत्रणा युद्ध पातळीवर कामाला लागली आहे. त्यामुळे सोमवारपासून सुरु होणारे उपोषण स्थगित करण्यात आल्याची माहिती आमदारांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

बोलतांना म्हणाले की,पाचोरा व भडगाव तालुक्यातील कालव्यांची कामे पावसाळ्या पूर्वी करणे अत्यावश्यक आणि गरजेचे आहे. या संदर्भात पाटबंधारे विभागाला लेखी व तोंडी सूचना देऊनही या कामांकडे पाटबंधारे विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याची नाराजी जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या पत्रात व्यक्त केली होती. पावसाळ्या पूर्वी या कामांची सुरुवात न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशाराही दिला होता. पावसाळा आठवड्या भरावर आला असतांना देखील पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पाचोरा मतदार संघातील लघु पाटबंधारेचा घोडसगाव बंधारा तसेच भडगाव तालुक्यातील कजगाव, पथराड कालवा यांचे दुरुस्तीचे कामे प्रलंबित आहे. आगामी पावसाळ्यात पिंपळगाव हरेश्वर, सावखेडा व वरखेडी गावाला धोका निर्माण होऊन ही गावे पाण्याखाली जाण्याची भीती आहे. या संदर्भात मागील सहा महिन्यांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पाटबंधारे विभागाचे मुख्य सचिव यांना बैठकीतून अवगत केले होते. तरीही या कामांची सुरुवात होत नसल्याने जनतेच्या व शेतकऱ्यांच्या हितासाठी थेट उपोषणाचा इशारा दिल्याने प्रशासनात खळबळ उडाली होती. माझ्या निवेदनाची जळगांव जिल्हाधिकारी यांनी विषयांचे गांभीर्य पाहून तात्काळ दखल घेत पाटबंधारे विभागांच्या अधिकाऱ्यांना पाचोरा-भडगाव तालुक्यातील प्रलंबित धरणांच्या दुरुस्ती कामांचे आदेश दिले. गेल्या दोन दिवसांत दोन्ही तालुक्यातील धरण दुरूस्तीची कामे सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी कामाचे फोटो पाठवून व लेखी पत्राद्वारे कळवले आहे.



